Wednesday, August 22, 2018


: महत्वाच्या चालू घडामोडी :


तिरुवनंतपुरममध्ये सायक्लोन वॉर्निंग सेंटरउभारले जाणार


अलीकडच्या काळात केरळ व कर्नाटक सागरी किनारपट्टीवर उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे आणि हवामानाविषयक गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने तिरुवनंतपुरममध्ये सायक्लोन वॉर्निंग सेंटरउभारण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

वर्तमानात भारत हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंतर्गत चेन्नई, विशाखापट्टनम, भुवनेश्वर, कोलकाता, अहमदाबाद आणि मुंबई या ठिकाणी सायक्लोन वॉर्निंग सेंटर कार्यरत आहेत.

गोपाळकृष्ण गांधी: राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्काराचे विजेता : 


माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 74 व्या जयंतीनिमित्त, पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.



राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार हा सांप्रदायिक सद्भावना, राष्ट्रीय एकात्मता आणि शांती प्रस्थापित करण्यात केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी दिला जाणारा एक भारतीय पुरस्कार आहे.
या पुरस्काराची स्थापना 1992 साली करण्यात आली. हा पुरस्कार अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे दिला जातो. पुरस्काराच्या स्वरुपात 10 लक्ष रूपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.

सिंगापूर, भारत यांच्यातल्या समुद्री द्विपक्षीय संबंधांना 25 वर्षे पूर्ण  :

भारत आणि सिंगापूर यांचे नौदल दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण द्विपक्षीय सागरी संबंधांचे 25 वे वर्धापन वर्ष साजरे करीत आहे. यानिमित्त सप्टेंबर-18 मध्ये दोन्ही देशांच्या नौदलांच्यामध्ये एक सागरी सराव आयोजित केला जाणार आहे.

सिंगापूर भारतात गुंतवणूकीचा एक प्रमुख स्रोत आहे आणि भारतीय कंपन्यांसाठी एक महत्त्वाची आर्थिक बाजारपेठ आहे. सिंगापूर आग्नेय आशियाई राष्ट्रांची संघटना (ASEAN) या प्रदेशाचे एक प्रवेशद्वार आणि पूर्वेकडील सीमा आहे.

निधन वार्ता 


ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण कालवश :


ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचे वयाच्या 63 वर्षी  निधन झाले आहे.

विजय चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवत होते.मोरुची मावशी या नाटकात त्यांनी अतिशय ताकदीने स्त्री पात्र रंगवले होते. हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहते. त्यांच्या चित्रपट, नाटकांतील अनेक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.

तसेच त्यांनी जवळपास 400 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मोरुची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली होती. 
अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 1985 साली प्रदर्शित झालेल्या 'वहिनीची माया' या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे निधन


 जयेष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे 22 ऑगस्ट 2018 रोजी दिल्लीत 94 व्या वर्षी निधन झाले. आणीबाणीच्या काळात नय्यर हे तुरुंगातही गेले होते. नय्यर यांना 2015 मध्ये रामनाथ गोएंका जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक, मानवाधिकार कार्यकर्ता, लेखक अशी त्यांची ओळख होती. त्यांनी जवळपास 14 भाषेतील 80 वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केले आहे. तसेच, आणीबाणी आणि भारत-पाकिस्तानवर पुस्तकही लिहिले आहे. कुलदीप नय्यर यांचा जन्म पंजाब प्रांतातील सियालकोटमध्ये झाला होता. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीतून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले. सुरुवातीला त्यांनी उर्दू रिपोर्टर म्हणून काम केले.

मानव हक्क चळवळीचे कार्यकर्ते असणारे कुलदीप नय्यर 1996 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य होते. याशिवाय, त्यांना 1990 मध्ये ब्रिटनमध्ये त्यांची भारतीय उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली होती. तसेच, 1997 मध्ये राज्यसभेत खासदार म्हणूनही त्यांना पाठविण्यात आले होते.

कलदीप नय्यर यांनी डेक्कन हेराल्ड, द डेली स्टाल, द संडे गार्डियन, द न्यूज, द स्टेट्समन, पाकिस्तानमधील द एक्सप्रेस ट्रिब्युन, डॉन आदी वृत्तपत्रांमध्ये लेखन केले आहे. तसेच, बियाँड द लाइन्स, विदाऊट फिअर: द लाइफ अँड ट्रायल ऑफ भगत सिंग, डिस्टंट नेबर्स, सप्रेशन ऑफ जजेस, इंडिया आफ्टर नेहरू, इंडिया-द क्रिटिकल इयर्स, द जजमेंट-इनसाइड स्टोरी ऑफ द इमर्जन्सी इन इंडिया, वॉल अॅट वाघा यासारख्या विविध पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे.


काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन


काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांचे बुधवारी सकाळी दिल्लीत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.  ते ६३ वर्षांचे होते. काँग्रेसमधील अभ्यासू नेते म्हणून ते ओळखले जायचे. काँग्रेसमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पडत संघटनकौशल्य सिद्ध केले होते.  त्यांच्या निधनाने मुंबई आणि महाराष्ट्र काँग्रेसचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

गरुदास कामत हे कामानिमित्त दिल्लीत गेले होते. बुधवारी सकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना दिल्लीतील चाणक्यपूरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोवर त्यांचे निधन झाले होते.

गरुदास कामत यांनी काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम केले असून ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. राज्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क असायचा. गुजरात, राजस्थान, दादरा नगर हवेली आणि दीव व दमण या राज्यांचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम केले.

गेल्या काही वर्षांपासून मात्र गुरुदास कामत पक्षनेतृत्वावर नाराज होते. राहुल गांधी यांनी मुंबईसंदर्भात संजय निरुपम यांना झुकते माप दिल्याने ते नाराज झाले. त्यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामाही दिला होता. मात्र, काही दिवसांनी त्यांची नाराजी दूर झाली व ते पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रीय झाले.
गरुदास कामत यांनी १९७२ मध्ये विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश केला. १९७६ मध्ये त्यांनी एनएसयूआयचे अध्यक्षपद भूषवले.